राष्ट्रीय एकता : वैविध्य, धोके
आणि विकास
“राम, रहीम, येशू, बुद्धाचा हा देश
देतो गुण्यागोविंदाने नांदण्याचा संदेश
‘भारतीय’ हीच आमची एकमेव जात
नसे आमुच्या एकतेत कोणती ददात.”
या ओळी भारताच्या अनेकतेतील एकतेचे
गुणगान करण्यासाठी पुरेशा आहेत. जात,
धर्म, वंश, प्रांत, भाषा आदी भेद विसरून
प्रत्येक जण केवळ ‘भारतीय’ याचं नावाने
वावरतो. इतके विविध धर्म, जाती, पंथ,
संप्रदाय असूनही इतक्या प्रेमाने एवढे सारे
लोक इथे राहतात. म्हणून भारत या जगात
एकमेवाद्वितीय आहे. आपण भारतातील
विविधतेचा आढावा घेऊ या.
• धार्मिक विविधता :-
भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन,
बौद्ध, पारशी, जैन, बहाई ई. विविध
धर्माचे लोक वास्तव्य करतात. विविध
धर्मांमध्ये विविध प्रकारे पूजा,
अर्चना केली जाते. विविध
परंपरा त्यांच्याद्वारे पाळल्या जातात.
विविध धर्माचे विविध उत्सव साजरे केले
जातात. हिंदूंची दिवाळी, गणेशोत्सव,
दसरा, मुस्लिमांची ईद, मोहरम,
शिखांची गुरुनानक जयंती, लोहरी,
ख्रिश्चनांचे ख्रिसमस, इस्टर, गुड फ्रायडे,
बौद्धांची बुद्ध पोर्णिमा,
जैनांची महावीर जयंती, पारशी लोकांचे
जमशेद नवरोईत ई. सण साजरे केले जातात.
सर्वच धर्माचा प्रमुख संदेश हा अहिंसा,
शांती व प्रेमाचा प्रसार करणे हा होय.
• भाषिक विविधता :-
भारतात १०,००० हून अधिक
भाषा बोलल्या जातात.
भारताच्या राज्यघटनेनुसार २२ प्रादेशिक
भाषांना शासकीय
राजभाषेचा दर्जा दिला आहे. यामध्ये
बंगाली, आसामी, बोडो, डोंगरी,
गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी,
कोकणी, मैथिली, मल्याळम, मतई, मराठी,
नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाली,
सिंधी, तमिळ, तेलगु, उर्दू
या भाषांचा समावेश आहे. यामध्ये
हिंदी ही सर्वाधिक
बोलली जाणारी भाषा आहे.
कलेतील विविधता :-
चित्रकलेमध्ये मधुबनी चित्रकला, मैसूर चित्रकला, राजपूत
चित्रकला, तंजावर चित्रकला, मुघल
चित्रकला हे प्रसिद्ध प्रकार आहेत.
वेगवेगळया राज्यांमध्ये भांगडा, गिडा,
झारखंड व उडीसासारखे छाऊ, राजस्थान
मध्ये घुमर, गुजरात मध्ये दांडिया, गरबा,
भरतनाट्यम्, उत्तर भारतात कथक, केरळ मध्ये
कथकली, मोहिनी अट्टम, आंध्रप्रदेशात
कुच्चीपुडी, मणिपूर मध्ये मणिपुरी,
उडीसात ओडिसी हे नृत्य प्रकार केले
जातात.
• जीवन पद्धतीतील विविधता :-
वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे लोक
वेगवेगळी जीवनपध्दती अवलंबतात.
त्यांचा पोशाख, अन्न यांच्यामध्ये वैविध्य
आढळते. साधारणतः धोतर, लुंगी,
पैजामा हा पुरुषांचा पोशाख असतो.
पुरुषांच्या बाबतीत पंजाब मध्ये डोक्यावर
पगडी, आसाम, उडीसा व तामिळनाडूमध्ये
लुंगी, गोव्यात डोक्यावर टोपी,
महाराष्ट्रात डोक्यावर फेटा असे
पोशाख पाहावयास मिळतात.
साधारणतः साडी, सलवार,
घागरा जा स्त्रियांचा पोशाख असतो.
स्त्रियांच्या बाबतीत बहुतेक
स्त्रिया साडी नेसतात आणि डोक्यावर
पदर घेतात. पुष्कळ
स्त्रिया अंबाडा घालतात. प्रदेशातील
तापमान, पर्जन्य, हवामान यांवर
लोकांची जीवनपद्धती अवलंबून असते.
त्यानुसार
त्यांच्या घरांची रचनाही बदलते.
प्रदेशानुसार
लोकांच्या चेहऱ्याची ठेवणही बदलते.
या सर्व
वैविध्येतही आपल्याला एकता आढळते.
त्यामुळेच या मोठ्या देशाचे सुरळीतपणे
नियमन चालू आहे. परंतु सध्या मात्र
आपल्या एकतेला विविध गोष्टींपासून
तडा जाऊ पाहात आहे. त्या सर्व
कारणांचा आपण मागोवा घेऊ या.
• दहशतवाद :-
भारतात नांदणारी शांतता अनेक
देशांना खटकते आहे. त्याप्रमाणे
दहशतवाद्यांना हल्ले
करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
काही दहशतवादी विशिष्ट धर्मियांवरच
हल्ले करतात. त्यामुळे पिडीतांच्या मनात
हल्लेखोरांच्या धर्माविषयी द्वेष
निर्माण होतो. ते त्याच धर्माच्या इतर
चांगल्या लोकांचाही द्वेष करतात.
त्यामुळे देशातील एकतेस तडा जातो.
• नक्षलवाद :-
दहशतवादाशी सामना करताना भारत
अंतर्गत नक्षलवादातच गुंतून पडला आहे.
गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर
या ठिकाणी त्यांचा मोठा प्रभाव आहे.
त्यांची भूसुरुंगातील विघातक स्फोटके
पाहून अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची कवचकुंडले
वेशीवर टांगली जात आहेत.
आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते
या मार्गाचा अवलंब करतात. यामुळे
देशाच्या एकतेला धोका निर्माण
होतो.
• गरीब श्रीमंतातील दरी :-
सतत वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे
दारिद्रय, उपासमार, कुपोषण,
बेरोजगारी या सारख्या समस्या
वाढल्या आहेत. तर दुसरीकडे भ्रष्टाचार करून
मंत्र्यांनी,
अधिकाऱ्यांनी करोडोनी पैसा कमावला
आहे. इकडे दररोज कित्येक
शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दाबून
आत्महत्या करतात तर तिकडे
मायावती आपल्या आवडत्या ब्रांडची चप्पल
आणण्यासाठी लखनौहून
मुंबईला खाजगी विमान पाठवतात.
भांडवलदारांचा वर्ग आर्थिक
प्रगती करतो तर कष्टकरी वर्ग जैसे थे!
अशा वेळी भांडवलदारांकडून
कष्टकरी वर्गाचे आर्थिक शोषण केले,
त्यांना लुबाडले जाते. इकडे
भांडवलदाराच्या माड्या चढतच जातात
तर तिकडे
गरिबांची साधी चंद्रमोळी झोपडीही
त्यांची साथ सोडते. त्यामुळे गरीब श्रीमंत
अशी विषमता निर्माण होते. त्यामुळे
भारतीयांमधील एकता भंग पावते.
कष्टकरी वर्गाच्या सहनशीलतेच्या पलीकडे
गोष्टी गेल्यास
त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो.
अशा वेळी आंदोलने, जाळपोळ, हिंसक कृत्ये
घडण्याची जास्त शक्यता असते.
• राजकीय पक्षांची सांप्रदायिकता :-
स्वतःच्या राजकीय
फायद्यासाठी राजकीय पक्ष
सांप्रदायिकतेला खतपाणी घालतात.
एखादया विशिष्ट धर्म किंवा जात
यांची मते
आपल्याला मिळावी यासाठी ते
त्या धर्म किंवा जातींना विविध
प्रकारची आमिषे देतात.
त्यांच्यासाठी आरक्षण ठेवतात. त्यामुळे
विशिष्ट धर्माच्या लोकांनाच
फायदा होतो. तर इतर धर्म
वा जाती मागासालेल्याच राहतात.
भारतीय संविधानातील कलाम २५, २६
आणि ३० नुसार सर्व धर्मांना समान
दर्जा देण्यात आला आहे.
संविधानाच्या प्रास्ताविकेतही तेच
म्हटलेले आहे. परंतु केवळ धर्म, जात, पंथ
यांच्या नावावर राजकारण करून
विशिष्ट धर्म वा जातीचे मुद्दाम गोडवे
गाऊन
आपल्या मतांच्या राजकारणासाठी ते
प्रयत्नरत असतात. त्यांना या धर्माची,
जातींशी काहीही देणेघेणे नसते.
किंवा त्यांना त्यांचा कोणता
विकासही करायचा नसतो.
त्यांना हवी असते ती केवळ सत्ता.
आणि सत्ता प्राप्त केल्यावर त्यांचा उद्देश
असतो तो मोठमोठे घोटाळे करून
पैसा कमावणे. सत्तेच्या या आंधळ्या खेळात ते
इतके आकंठ बुडालेले असतात की ते लोकांमध्ये
आपापसात भांडणे लावून देतात. दंगली घडवून
आणतात. एवढेच नव्हे तर विशिष्ट
धर्माच्या लोकांच्या कत्तली घडवून
आणतात. अशा कृत्यांमुळे विविध धर्माचे
लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करणे तर दूरच
त्यांच्याविषयी द्वेषभाव आपल्या मनात
ठेवतात. परस्पर विरोधी धर्मांना,
त्यांच्या देवतांना,
त्याच्या अनुयायांना शिव्याशाप देतात.
त्यांच्या प्रार्थना स्थळांना हानी
पोहोचवतात. त्यांच्यावर हल्ले करतात,
त्यांना हीन दर्जाची वागणूक देतात.
अशा प्रकारे राजकीय पक्ष
आपल्या राजकीय
स्वार्थासाठी लोकांची एकता तोडतात
. आणि ‘फोडा आणि राज्य करा’
या उक्तीप्रमाणे त्यांच्यावर राज्य
करतात. भारतीयांना विदेशी संस्कृतीचे
फारच वेड आहे. आपल्या चालीरीती,
परंपरा विसरून त्यांनी पाश्चिमात्य
संस्कृतीचा अंगीकार केला आहे.
इंग्रजांच्या सुमारे १५० वर्षाच्या प्रदीर्घ
वास्तव्यामुळे हे घडले असावे. सामान्य
लोकांनी त्यांच्या संस्कृतीचा अंगीकार
केला. इंग्रज
जेंव्हा स्वतःला भारतीयांसमोर कमकुवत
होताना पाहात होते तेंव्हा ते
‘फोडा आणि राज्य करा’
या नीतीचा वापर करीत होते. ते
धर्माधर्मामध्ये भांडणे लावून देत. त्यामुळे
भारतीयांच्या एकतेत खंड पडून ते
आपापसातील भांडणांमध्येच गुंतल्याने नेटाने
क्रूर इंग्रजांचा प्रतिकार करू शकण्यास
असमर्थ होते. इंग्रजांची ही खेळी लक्षात
घेऊन गांधीजी हिंदू-मुस्लिम
ऐक्यासाठी लढले. या एकतेसाठीच
त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले. जातीवाद,
धर्मवाद, प्रांतवाद यांचा त्याग करून
नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक,
भगतसिंग, मौलाना आझाद, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर,
महात्मा गांधी यासारख्या देश
भक्तांनी आपल्या प्राणांची बाजी लावून
अपूर्व असे स्वातंत्र्य मिळविलेच.
आपल्या देशाचे ऐक्य कायम राहिले तरच आपण
आजची ही हृदयद्रावक परिस्थिती बदलू
शकतो. आपण जर जातीवाद, धर्मवाद,
प्रांतवाद यांच्या गुंत्यातून बाहेर पडून
कधी विचार केला असता तर आपल्यावर आज
हि परिस्थिती ओढवली नसती. आज
जी गगनाला भिडलेली महागाई आहे,
पेट्रोल, डीझेल यांचे अतुच्च वाढीव दर आहेत ते
राहिलेच नसते. कारण जर आपण धर्म, जात, वंश,
पंथ, संप्रदाय यांच्या चौकटीतून बाहेर
पडलो असतो तर आपण सरकारवर कडक वचक ठेवू
शकलो असतो. आपल्या देशातील
ज्या भ्रष्टाचार, दारू, कुपोषण, प्रदूषण,
स्त्री भृणहत्या,
अस्वच्छता यांसारख्या समस्या आहेत
त्या कधीच पळून गेल्या असत्या.
आपल्या देशाची अधोगती थांबवायची असेल
तर सर्वप्रथम राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणे
गरजेचे आहे. जर आपण एकीने राहिलो तर आपण
प्रगती करू शकतो, आपले कोणी काहीच
बिघडू शकत नाही ही गोष्ट
पशुपक्ष्यांनादेखील माहित आहे. म्हणूनच
तेसुद्धा एकीचे बळ जाणून कळपाने राहतात.
मग आपण तर माणसे आहोत. देवाने
आपल्याला सद्सद्विवेक बुद्धी दिली आहे.
परंतु आपण या बुद्धीचा वापर न
करता भलत्याच गोष्टी करत बसतो.
ही आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल.
निदान त्या मुक्या प्राण्यांकडून तरी आपण
बोध घ्यायला हवा.
राष्ट्रीय ऐक्याचा विकास
करण्यासाठी लोकजागर करणे अगत्याचे आहे.
याकरिता शाळांशिवाय दुसरे कोणतेच
मध्यम इतके योग्य नाही. कारण
बालपणी मनुष्य जी मुल्ये शिकतो, त्यावरच
तो आयुष्यभर चालतो. म्हणूनच शाळांमध्ये
विद्यार्थ्यांना आपण प्रथम फक्त भारतीय
आहोत, हे समजावून दिले पाहिजे. नंतरच मग
आपले राज्य, आपला धर्म, आपली जात
या गौण गोष्टी येतात. कारण युद्धभूमीवर
लढणारा सैनिक, दुसऱ्या देशात जाऊन
खेळणारा खेळाडू हा प्रथम भारतीय असतो.
आपण जेव्हा परकीय देशात
जातो तेव्हा कोणी आपल्याला आपले
राज्य, धर्म, प्रांत किंवा जात विचारात
नाही तर आपल्याला आपले राष्ट्रीयत्व
विचारतो. म्हणून जर
आपल्याला आजची विघातक
परिस्थिती बदलायची असेल राष्ट्रीय
एकात्मता निर्माण करणे जरुरी आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचा पाया ही सामुदायिक
संस्कृतीची कल्पना होय. 'भारतीय' हीच
आपली एकमेव ओळख आहे. या एकतेतच आपले खरे सामर्थ्य आहे.
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.