बालगीत

मनासारखे झाले तर...





मनासारखे झाले तर
किती किती मजा येईल
मनाला वाटेल ते सारे
प्रत्यक्ष करता येईल 

रंगीबेरंगी पक्ष्यांसंगे
आकाशी भरारी घेणार
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या
जगाची सैर करणार

माझ्या प्रिय चांदोमामाची
एकदा घेईल मी भेट
तेजाचे रहस्य जाणण्या
जाईल सुर्यापाशी थेट

स्वप्नातल्या परीकडून
मी जादूची छडी घेईल
तो गोलगोल फिरवून
सर्व इच्छा पूर्ण करील

'मनासारखे झाले तर'
कल्पनेने मी आनंदतो
मनासारखे व्हावे अशी
नेहमी आशा बाळगतो 


 विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

---------------------------------------------------


तहानलेल्या कावळ्याची गोष्ट 


एके दिवशी कावळ्याला लागली भारी तहान
पाण्याच्या शोधात त्याने धुंडाळले सारे रान 


 "पाणी, पाणी" म्हणून त्याने केला आरडाओरडा
पाण्याविना त्याचा घसा झाला कोरडा

  

पाण्यासाठी त्याने शोधल्या दाहीदिशा 
हळूहळू त्याची सुटत चालली होती आशा


अचानक त्याला दिसला एक माठ दूरवर 
कावळ्यास दिसले त्यात, पाणी थंडगार


पाणी पाहून कावळ्याला फार आनंद झाला 
पण बघतो तं काय, "पाणी होते तळाला"


 चोच कावळ्याची, तळाशी काही पोचेना 
'पाणी कसे प्यावे ?", त्याला काही सुचेना


हुशार कावळ्याने चालविली आपली अक्कल 
पाणी वर आणण्याची, त्याला सुचली शक्कल


माठात दगड टाकले, कावळ्याने पटापट 
वर आलेले पाणी, प्याले त्याने गटागट


पाणी पिऊन कावळा झाला, अगदी टवटवीत 
आणि भरकन उडून गेला खुशीत 

 विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा